Monday, October 2, 2017

"किती वेळ रे...मला पण ऑफिसला जायचंय. लेट होतोय"
ती बाथरूमच्या दरवाजावर चौथ्यांदा थाप मारत बडबडत निघून गेली. हातातली सकाळची कामं चालू होती.नुकतीच मुलांना बस मध्ये सोडून आली होती. मुलं नाश्ता करायला बसली तेव्हा हा अंघोळीला गेला होता. त्यांचं  आवरून ही त्यांना बस मध्ये सोडून आली तरी हा बाथरूम मध्येच होता. म्हणून ती वैतागली .
दारावरची  चौथी  थाप  ऐकून  तोही  वैतागला  होता . दाढी  करून  आंघोळ  करायला  एवढा  वेळ  लागणाररच  ना . हिला  कटकट  केल्याशिवाय  काही  करताच  येत  नाही . सकाळी  उठल्यापासून  हात  आणि  तोंड दोन्ही  चालू . नको  तिथे  पण  भुणभुण . वैताग  नुसता ! चिडला  होता  तोही .

"काय  झालं  एवढं बोंबलायला ? आकाश  कोसळलंय  काय?" त्याने  रागातच  विचारलं .

"हो. कोसळणारच आहेत आज आकाश सर माझ्यावर. आज वेळेत गेले नाही तर तिसरा लेट मार्क लागेल, एक सी.एल जाईल. आणि आकाश सर बोंबा मारतील माझ्या नावाने..आता तू मारतोय्स तसा. जळलं मेलं! जिथे जावं तिथे मर मर कामं करून लोक बोंबलणारच आपल्या नावाने. ऑफिस मध्ये पण तेच आणि घरी पण तीच तऱ्हा."

"मग कामं कर ना फक्त स्वतःची. तोंडाचा पट्टा कशाला सोडतेस?"
"बरोबर. सकाळच्या घाईच्या वेळेत स्वतः एक तास बाथरूम एंगेज ठेवलंस..त्या बदल्यात माझ्या तोंडाचा पट्टा नाही तुला तर सोन्याचा कंबरपट्टा बक्षीस मिळायला हवा."
"शी!. तुलाच ठेव तो.  दाढी करून अंघोळ करायला एवढा वेळ लागतो. पण तुला कशाला कळेल ते."
"हजार वेळा सांगिलताय, दाढी सिंक जवळ उभा राहून करत जा. दार लावून करायला तू काय तिजोरीतल्या पैश्यां सारखे दाढीचे केस मोजतोस का काढून झाल्यावर?"
" जा ग. तुझ्या तोंडाची चक्की कधी बंद होणार नाही. अशी घाण येत राहणारच त्यातून. जा आवर जा तुझं!"
" जाते. नाहीतर काय माझी कामं तू करणार आहेस? इकडची काडी तिकडे तरी करायची माहिती आहे का सकाळी? आयतोबा नुसता!"
ह्यावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याला ही उशीर होत होता. आणि त्याला भांडण वाढवायचं नव्हतं. आणि कुठेतरी त्याच्या एका मनाने सांगितलंच " हे मात्र ही बरोबर बोलतीये हा!"
काय मदत करणार मी हिला? केर-बीर काढणं. भांडी घासणं आपल्याला शोभत नाही. भाजी-बीजी काय आपल्याला करायची सोडा, चिरता पण येत नाही. ही कामं आईनी कधी आम्हाला करावी लागतील याची जाणीव ही करून दिली नाही. मुलांचं काही करावं, तर त्यांना सगळ्या साठी ममाच हवी असते.
असो. हिची निरर्थक बडबड कधी संपणार नाही. कशाला विचार करून आपला आणखी वेळ घालवा?
त्याने पटापट तयारी केली. डायनिंग टेबल वर व्यवस्थित मांडून ठेवलेल्या एका प्लेट मध्ये नाश्ता वाढून घेतला. पटापट खाल्ला. आणि संवादासोबत वाद नको म्हणून तिच्याशी काहीही न बोलता निघून गेला.

ऑफिसला पोहचुन चहा घेऊन कमला सुरुवात केली. एक तासाची एक मिटिंग अटेंड केली. मिटिंगरूम मध्ये बाहेर पडताच बघतो तर त्याचे कोणीच मित्र जागेवर नव्हते. काचेच्या दरवाजातून बाहेर रिसेप्शन जवळच्या टी. व्ही जवळ त्याला घोळका दिसला.

कामं सोडून हे लोक तिथे काय करत आहेत? आज कुठली  मॅच पण नाहीये. मग? विचार करत करत तोही काचेचा दरवाजा उघडून टी. व्ही जवळ पोहोचला. भयंकर बातमी होती. एल्फिन्स्टन रॉड आणि परळ स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी मार्गावर चेंगराचेंगरी झाली होती. प्रचंड गर्दीत ब्रिज कोसळल्याची अफवा कोणीतरी पसरवली आणि ही चेंगराचेंगरी झाली. २२ लोकांचा मृत्यू झाला असून २५-३० जण गंभीर रित्या जखमी झाली आहेत. टी.व्ही वरचे बातमीदार आपला काम करत होते. आणि तिथली दृश्य पाहून त्याच्या जवळची घोळक्यातली सगळी माणसं हळहळत होती, चुचकारत होती.

अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. ती पण रोज ह्याच ब्रिजने जाते. एल्फिन्स्टन वरून चर्चगेट ट्रेन पकडते. शप्पथ!!!! आता काय करावं? सुन्न झाला तो. पटकन मोबाईल बाहेर काढून तिचा नंबर फिरवू लागला. फोन वाजत होता एक सारखा. पण ती काही फोन उचलत नव्हती. अरे देवा! अडकली की काय ही पण त्या गर्दीत. त्या चेंगाचेंगरीत हिला काय झालं असलं तर? त्याला घाम फुटला ए सी मध्ये. त्यानं मित्राला बॉसला कळवायला सांगून, तसाच धावत सुटला. वाटेत किमान ५० वेळा तिचा फोन लावला. पण तिने काही उचलला नाही. त्याच्या मनातली शंकेची पाल आता पार मगरीएवढी मोठी झाल्या सारखं त्याला वाटलं.

स्टेशनला जायला रिक्षा  मिळाली. पण वाटेत  इतकं ट्रॅफिक होतं की अजिबात गाड्या हालत नव्हत्या. ठाणे ते परळ चालत तरी कसं जायचं. प्रचंड टेन्शन आलं होतं. देवा! हिला काही होऊ देऊ नको रे. सुखरूप ठेव ! मुलांचं कास होईल? आणि माझं? त्याला सकाळचं भांडण आठवलं त्यांच. उगाच भांडतो आपण तिच्याशी काही वेळा!
काय काय बोललो आपण तिला..तोंडाचा पट्टा काय, घाण काय! आपला पण आपल्यावर ताबा राहत नाही. बिचारी एवढं करते घरासाठी, मुलांसाठी, आपल्यासाठी. दमते. चिडते. आपण खरंच तिला समजून घेतो का? तिला आता काय झालं असलं तर आपण तिची माफी तरी मागू शकू का? आणि नाही मागता आली तर स्वत:ला कधी माफ करू शकू का?

 जेमतेम स्टेशन गाठलं आणि त्याचा फोन वाजला. स्क्रीन वर तिचा फोटो आणि नाव पाहून त्याला क्षणभर इतकं बरं वाटलं की फोन उचलायचा पण त्याला सुचेना. पण भानावर येऊन त्याने ३-४  सेकंदांनी फोन उचलला.

" काय रे? एवहडे मिस्ड कॉल्स? काय झालं?

"तू पोहोचली का ऑफिसला ?"

' तिथे एल्फिन्स्टन ब्रिज ची बातमी पहिली टी. व्ही वर. म्हणून फोन करत होतो. बाकी काही नाही.' ही वाक्य गिळली त्याने. लगेच इगो बाहेर आला. काळजी आहे, पण दाखवायची नाही.
"हो. अरे एल्फिन्स्टन ब्रिज वर काहीतरी प्रॉब्लेम झाल्याच मैत्रिणीने कळवलं. म्हणून दादरला उतरून ट्रेन चेंज केली. तिथे माहिती आहे ना तिन्ही त्रिकाल मरणाची गर्दी. म्हणून फोन पर्स मधून बाहेरच काढता आला नाही.
त्याने क्षणभर डोळे मिटून देवाचे आभार मानले. आणि फोन ठेवला.
ती मैत्रिणीच्या आधाराने उठत ऑफिस मधल्या डॉक्टर कडे जाऊ लागली. त्या ब्रिजवरच्या धावपळीत तिच्या पायाला लागलं होतं आणि हाताला ही मुका मार बसून तो सुजला होता. कशी तरी ती एल्फिन्स्टन स्टेशन ला पोहोचली होती. माटुंग्याहून ट्रेन मधून येणाऱ्या तिच्या मैत्रिणीने तिला पाहिलं  होतं आणि ती मैत्रीण तिला एल्फिन्स्टन वरून थेट टॅक्सी ने चर्चगेट ला घेऊन आली होती.
" अगं त्याला सांगितलं का नाहीस ? तो आला असता ना इथे." मैत्रिणीने न राहवून विचारलं"
" त्याला खूप टेन्शन आला असत ग. आणि जरी मी इकडे येण्यापासून थांबवलं असत तरी तो दिवसभर टेन्शन मध्ये राहिला असता. आणि इतकं कुठे लागलंय मला. २ दिवस सुट्टी घेतली की होईन बारी. मुलांना पण उद्या पर्वा सुट्टीच आहे. सो नो प्रॉब्लेम."
हे तिच्या दोन मुलं असलेल्या मैत्रिणीला कळायला अजिबात जड गेलं नाही.

-सुमेधा आदवडे

Friday, July 21, 2017


"अरे वा! आज चक्क गजरा!"

ती एकदम आश्चर्य चकित होऊन  म्हणाली. सध्या च्या  परिस्थितीत त्याच्याकडून एका साध्या कटाक्षा साठी तिला तरसायला लागत होतं. लग्नाला अनेक वर्षे उलटूनगेलेल्या अनेक जोडप्यांसारखं त्यांच्यातल्या संवादाची पातळी आणि आपुलकी दोन्ही यथास्थता झाली होती. त्यामुळे ह्या छोटयाश्या गोष्टीने सुद्धा तिला खूप आनंदझाला ह्यात काही नवल नव्हते.

त्याने तिच्या हातात दिलेला गजरा घेतला आणि तिला म्हणाला,
" मागे फिर, माळून देतो." ती हसून वळली. त्याने हलकेच गजरा माळला. तिला खूप छान वाटलं.

लग्न आधी तिला गजरा कधीच आवडायचा नाही. ती शक्यतो वेस्टर्न कपडे घालायची. त्यामुळे गजरा कधी फारसा माळला जायचा नाही. कधी सणा-समारंभाला आईने सांगितलं तर नाक मुरडायची ती.
पण लग्नानंतर अनेक गोष्टीं सोबत आवडी निवडी ही बदलल्या. प्रेमाने सांगितलेल्या गोष्टी सक्तीच्या न वाटता नवऱ्याच्या प्रेमाखातर आवडू लागल्या. नंतर प्रेमाचीव्याख्या बदलली किंवा priorities बदलल्या म्हणून सक्ती उरली. असो. ह्या क्षणी तरी छान वाटतंय ना! बास!

"काय बनवलंय आज जेवायला?" त्याने विचारलं.

"अजून सुरुवात नाही केलीये स्वयंपाकाला. काय बनवू सांग."

"काही नको. आपण आज बाहेर जाऊया जेवायला." 

आणखी एक shock ! ह्याला आज झालंय तरी काय? इतका कसा आज राजा उदार झालाय?
लगेच तिचं दुसरं मन उसळून म्हणालं "काहीही काय? तो काय कंजूष नाहीये." 
माहित आहे. पण आज काहीतरी घडलंय हे नक्की. स्वारी फारच खुशीत दिसत्ये आज. पण खुशीत तर आधीही असायचा. पण कधी आपल्याशी इतका चांगला वागला नाही.मग?  
काय करावं त्याने? चांगला वागला तरी तुला प्रॉब्लेम, नाही वागला तरी तू उदास. करावं काय त्याने? सगळ्या गोष्टीत संशय घ्यायची मेली सवयच झालीये तुला! आता तो प्रियकरासारखा वागतोय तर तू का टिपिकल 
बायको मोड मध्ये आहेस? ऐक ना त्याचं. जा तयार हो मस्तपैकी आणि दोघं छान एन्जॉय करा. नसती खुस्पटं काढत बसलीये! 
बरं बरं. एवढं काही बोलायला नको. आज तो काही बोलत नाहीये तर तू मला ऐकवतोय्स का?

ती खुद्कन हसली. तिच्या दोन मनांमधली खडाजंगी संपली होती आणि तिला positive कौल का काय तो मिळाला होता.

तिने त्याच्या आवडीचा पिवळा आणि गुलाबी सलवार कमीझ घातला. केस विंचरून गजरा पुन्हा नीट माळला. दोघे कार ने निघाली. वाटेत तो अखंड गप्पा मारत होता. ती शांतपणे पण लक्ष देऊन ऐकत होती. थोडं अंतर गेल्यावर तिला रहावलं नाही. तिने विचारलंच.
"तुझा मूड खराब करायचा नाहीये मला. पण एक विचारू?"

"अगं विचार ना. माझा मूड आज कशानेही खराब होणार नाहीये." तो

"आज काय झालंय तुला? अचानक बाहेर जेवायला वगैरे?"

"चालणार आहे ना तुला? तुझी इच्छा नसेल तर आपण घरी जाऊया. मी काहीतरी पार्सल आणतो"

"नाही रे. माझी इच्छा नसायला काय झालंय? पण मघाशी घरी आल्यापासून मी बघतीये, तू खूप आनंदात आहेस. मला सारखं वाटतंय कि आज काहीतरी छान घडलंय तुझ्या सोबत. काय ते सांगितलंस तर त्याचा मलाही आनंदच होईल असं तुला नाही वाटत का?"

"काही नाही  ग. आज आमच्या ऑफिस मध्ये "happiness unlimited " असा एक सेमिनार होता. त्या माणसाने एक कथा सांगितली. तशी काल्पनिकच म्हणायची. पण त्या कथेचा मी अजूनही विचार करतोय. त्याचा प्रत्येक शब्द माझ्या कानात घुमतोय. मनात फिरतोय. अजून."

"कुठली कथा ?"
तिला आश्चर्य वाटलं. अशी कुठली कथा असेल ह्याला एवढी आवडलेली. ह्याला इम्प्रेस करणं म्हणजे ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यापेक्षा महाकठीण काम. त्याला कधीच कुठली गोष्ट फार अशी आवडत नसे. तिच्या तर प्रत्येक गोष्टीत त्याने लग्नानंतर खोड काढली होती. असो.

तो सांगू लागला,
"फार पूर्वी म्हणे अरब देशात एक इसम रहायचा. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. साधा माणूस. पण नेहमी आनंदी आणि समाधानी. सतत चेहऱ्यावर हसू. एके दिवशी त्याला एक कप सापडतो. त्या कपात रडलं की अश्रुंचे मोती तयार होतात हे त्याला कळतं. पण ह्या पठ्ठ्याला कधी रडूच येत नसे. मग तो सतत उदास राहण्याचा प्रयत्न करू लागतो. दुःखाच्या ठिकाणी आवर्जून जाऊ लागतो. आणि त्या कपात रडून अश्रुंचे मोती तयार करू लागतो. हळूहळू त्याला ह्या मोत्यांच्या आणि त्यातून येणाऱ्या श्रीमंतीचा मोह होऊ लागतो. त्याचं लग्न होतं. बायकोवर प्रेम खुप. पण बायकोला आनंदी ठेवू शकत नाही. कारण स्वतःला आनंदी राहणं गरजेचं वाटत नसतं. शेवटी तो माणूस मोत्यांच्या डोंगरावर बसून आपण स्वतः संपवलेल्या बायकोच्या प्रेतावर रडतो असा त्या कथेचा शेवट आहे."

"बापरे" तिच्या अंगावर काटा आला.

" मी खूप विचार केला ह्या कथेचा. म्हटलं यार! आपण आनंद हवा आनंद हवा म्हणून सगळी कडे भटकत असतो. पण जी माणसं आपली आहेत, आपल्या जवळ आहेत, त्यांच्या सुखात आनंद शोधणं किती सोप्पं आहे. मघाशी एका लहानश्या गजऱ्यानेही तू कित्ती खुश झालीस. तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मलाही खूप बरं वाटलं."

ती खुदकन हसली पुन्हा. आपला नवरा आपल्यावर मनापासून खूप प्रेम करतो आणि आपल्या सुखासाठी प्रयत्न करतो ही कल्पनाच अत्यंत सुखावणारी आणि positive आहे. 

हॉटेल जवळ आल्यावर ती कार मधून उतरली. तो गाडी पार्क करून आला आणि दोघे जीना चढत असताना तिच्यातली बायको पुन्हा जागी झाली.

"काय रे. पण मला एक सांग. मोती मिळवण्यासाठी त्याला उदास राहायची काय गरज होती? रोज कांदा चिरला असता तर ढीगभर मोती मिळाले असते. उगाच त्या बिचाऱ्या बायकोला मारलं बावळाटाने."

तो हसू लागला आणि आश्चर्यचकितही झाला. हे त्याच्या डोक्यातही आलं नव्हतं. कसं येणार? असे उपाय बायकोलाच सुचू शकतात. त्या माणसाला पण हिच्या सारखी बायको असती तर ती वाचली असती.
कमाल आहे आपली. "हिच्याशी लग्न करून आपण फसलो" इथपासून "इतरांना पण हिच्या सारखी बायको मिळावी." इथपर्यंत आपण पोहोचलो. प्रगती आहे.

दोघे आत जेवायला गेली.

-सुमेधा आदवडे 

Sunday, July 2, 2017

आज तो खूप excited होता. ज्या गोष्टीची इतक्या आतुरतेने तो..तोच काय घरातले सगळेच वाट पाहत होते...कदाचित ती गोड बातमी आज त्यांना मिळणार होती. ती आल्यावर लगेच दोघं निघणार होती डॉक्टर कडे जायला. हो! बहुतेक त्यांना इतके महिने, इतके दिवस हूल देणारा छोटा पाहुणा अखेर त्यांच्या घरात येणार होता. पाहुणा किंवा पाहुणी. काही चालेल. जे होईल ते आपले असेल. पण आपले आयुष्य मात्र बदलून जाईल त्याच्या येण्याने.
आज आईला ही गोड बातमी कळल्यावर तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या अकस्मात आनंदाची कल्पना करून तो मनातून हुरळून गेला होता. खूप पाऊस येऊन गेल्यानंतरआकाशात अचानक दिसणाऱ्या ईंद्रधनुष्यासारखे सगळे रंगीत होऊन जाईल. त्याला स्वतःवर हसू आले. ह्या सुंदर गोष्टीने त्याला काव्यात्मक विचार करायला भाग पाडलंय. कविता हा त्याचा प्रांत कधीच नव्हता.

तो तिच्या साठी तयार होऊन बसलाच होता.  थोड्या वेळाने ती आली. पार थकलेली, ओढलेली दिसत होती. त्याला वाटलं दिवसभराच्या कामाने थकली असेल. आता चहा घेऊन फ्रेश झाली की होईल नीट. पण ती काही बोलेचना. त्याच्या नजरेला तिची नजर भिडली आणि तिला रडूच फुटलं.

"काय झालं ग?" त्याने गोंधळून जाऊन विचारलं. त्यासरशी ती त्याला त्याला बिलगून हमसाहमशी रडू लागली.
थोड्या वेळाने रडण्याचा भर ओसरल्यावर तिने त्याच्या कडे पाहून नकारार्थी मान हालवली. त्याला याय कळायचं ते कळलं आणि झटकन त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला.
" अगं पण इतक्या उशिरा?"
ती काहीच बोलली नाही. तिचे डोळे अजूनही वाहतच होते.
"तूच म्हणाली होतीस ना १५-१६ दिवस उलटून गेलेत म्हणून?" ती गप्पच. ह्यावर काय उत्तर देणार? खरंच १६ दिवस उलटून गेले होते आणि तिची पाळी अगदी नियमित होती. मग असं कसं झालं? 

ती विचार करतच सोफ्यावर बसून राहिली. त्याचा मात्र पार मूड गेला होता. तो लांब खिडकीत जाऊन उभा राहिला. त्याच्या कडे नजर जाताच तिला खूप वाईट वाटलं. लग्न नंतर वर्षभर त्यांनी planning केलं  होतं . पण जेव्हा पासून बाळ होऊ द्यायचा निर्णय त्यांनी घेतला होता तेव्हा पासून  त्याच्या नजरेत दररोज, सतत तिने एक आशा बघितली होती. बाबा होण्याची. आपल्या घरात कोणीतरी लहान मूल  येणार ह्या विचारानेच त्याच  भान हरपून जायचं. लहान मुलं म्हणजे त्याचा जीव की प्राण. त्यात आपलं स्वतःचं बाळ म्हणजे प्राणाहून ही प्रिय.  तिला क्षणभर अपराधी ही वाटून गेलं

तिचंही हे स्वप्न होतंच. तिलाही आशा होती नव्या पाहुण्याची. तिला आई म्हणणाऱ्या नव्या जीवाची तिलाही ओढ लागली होती. म्हणून तर ४ महिनेच प्रयत्न करून यश येत नाही म्हटल्यावर तिही लगेच ट्रीटमेंट घ्यायला तयार झाली होती. दोघांचेही सगळे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल होते. आणखी 2 महिने  असेच गेल्यावर सासू बाईंनी तर लगेच देव-ब्राम्हण, गुरुजींना साखडं घालायला सुरुवात केली होती. त्यांच्या नजरेत मात्र दर महिन्याला ही 'झाली' कळलं की फक्त तिरस्कार दिसायचा. मग पुढचे ४ दिवस फक्त टोमणे आणि तिरसट बोलणं. तसं एरव्ही पण काही त्या फार प्रेमाने बोलायच्या, वागायच्या असं नाही. तिची नव्याची नवलाई संपल्यावर त्यांच्यातली सासू हळूहळू डोकावू लागली होती. आणि बाळाचा विषय म्हणजे अगदी त्यांच्या कुटुंबाचा...घराण्याचा कुलदीपक अँड ऑल.

तरी त्यांचा हेतू वाईट नाही म्हणून तिनं ह्याबाबतीत त्यांचं सगळं ऐकून घेतलं होतं आता पर्यंत. एका गुरुजींनी पूजा घालायला सांगितली होती. सासूबाईंनी तिच्या आईला फोन करून तिच्या माहेरी पूजा घालायला सांगितली. का तर म्हणे तिच्या पत्रिकेत मातृसुखासाठी काही अडचणी आहेत. तिच्या आईने तिच्या माहेरच्या गुरुजींना विचारले तर ते  म्हणाले की ही पुणे जोड्याने करायची असते आणि त्यांच्या घराच्या वंशा साठी इथे पुजा  करून काही फळ मिळणार नाही. पण सासू बाई त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. म्हणे पूजा तिच्या माहेरीच करायची! काही दिवस असेच गेले. मग तिला कळलं की  त्या पुजे साठी कुठल्याशा देवाच्या सोन्याच्या मूर्ती घडवायच्या होत्या. सगळं मिळून पूजेचा खर्च पंचवीस हजार होत होता. म्हणून त्या तिच्या माहेरच्यांवर सगळं टाकायला बघत होत्या. म्हणजे वंश तुमचा वाढणार आणि भुरदंड माझ्याच  आई वडिलांना. शिवाय कशावरून माझ्याच पत्रिकेत दोष आहे? आणि असला तरी मी आता ह्या घराची झालीये ना? मग पूजा माहेरी का? आणि  हे सगळे  करुन बाळ  होणारच अस का कुणाला संगता येतं ? तिला अतिशय वाईट वाटलं होतं. पण सासू बाईंना ह्या विषयी ती  काहीच बोलली नव्हती.

काहीच होत नाही म्हटल्यावर सासूबाईंनी दुसऱ्या गुरुजींना गाठलं. त्यांनी प्रत्येक दिवस तिला एकेक देव वाटून दिला. सोमवारी शंकराला बेल आणि नारळ वाहायचा, मंगळवारी गणपतीला दुर्वा, जास्वंद आणि नारळ वाहायचा, गुरुवारी औदुंबराला ७ प्रदक्षीणा घालायच्या, शुक्रवारी भवानी मातेची ओटी भरायची आणि शनिवारी मारुतीला तेल वाहायचं. एवढ सगळं वेगवेगळ्या देवळात जाऊन करायचं म्हणजे सकाळी आवरणार कधी आणि ऑफिसला जाणार कधी? ह्यावर सासू बाईंनी त्यांच्या जालीम डोक्यातून एक जालीम उपाय सुचवला. म्हणे चार महिने ऑफिसला हाफ डे घेऊन मग जा. तिने ऑफिस मध्ये चालणार नाही म्हटल्यावर म्हणे, त्यांना सांग अर्धाच पगार द्यायला ४ महिने. आपल्याला काय पैसा महत्वाचा आहे की बाळ होणं? तिने मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. ती काय कुठे रोजंदारी वर मजुरी करायला जात होती का, ४ महिने अर्धा दिवस कामावर जायला? शेवटी नवऱ्याला तिने स्पष्टपणे सांगितलं मला हे पटत नाही. मी हे करणार नाही. नवरा म्हणे पटत मला पण नाही. पण ह्यात नुकसान काय आहे करून बघायला? तिने त्याच्या कडे जळजळीत कटाक्ष टाकल्यावर तो गप्प बसला. तरी बरं लग्नाला जेमतेम दिड वर्ष झालं होतं. ज्या लोकांना लग्नाच्या अनेक वर्षां पर्यंत बाळ होती नाही ते असेच वेड्या सारखे उपाय करतात का?

सगळं आठवून ती खूप उदास  झाली होती. डॉक्टरने त्या दोघांना ही सांगितलं होतं की प्रयत्न करत रहा. पण ह्या गोष्टीत यश येण्यासाठी तुझी मानसिक स्थिती आनंदी आणि समाधानी असणं हे  फार महत्वाचं आहे. घरातल्या  ह्या अशा वातावरणात कसला आनंद आणि कसलं समाधान? उलट ती दिवसें दिवस खचत चालली होती. सतत उदास राहायची. एकटीच रडत बसायची बरेचदा. पण तिला कधी कोणी समजून घेतलं नाही. खरंतर ह्यात तिचा दोष काहीच नव्हता. पण सगळ्यांच्या नजरेत तिला फक्त तिच्यावर आरोप दिसायचे, नवऱ्याच्याही. त्याने ही तिला कधी ह्या बाबतीत दिलासा देणारं काहीच म्हटलं नव्हतं. कळत नसेल का त्याला तिला किती त्रास होतोय ते? की त्याच्या स्वतःच्या स्वप्नामागे तो इतका उतावीळ झालाय की त्याला तिची परिस्थिती जाणून घ्यायची नाहीच आहे? पण हे स्वप्न पण तिच्या मुळे साकार होणार आहे ना? मग आधी तिला नको का बघायला?

ती उदासपणे उठली. बाथरूम मध्ये गेली. न्हाऊन बाहेर येते तोवरच सासूबाई आल्याच तिच्या खोलीत. ह्या वेळी न्हाईली म्हणजे...त्यांनी तिच्या कडे पहिले. तिने मान खाली घातली..का ते तिलाच कळले नाही..पण नंतर तिला स्वत:चाच राग आला.
"हो का? गेला का हा पण महिना? आमच्या नशिबात नातवाचं तोंड पहाणे नाहीच बहुतेक."

सासूबाई ३ वाक्यात गरळ ओकून गेल्या आणि तिच्या डोळ्यांना पुन्हा धारा लागल्या. ती किती वेळ रडत होती तिचं तिलाच कळलं नाही. पण मग थोड्या वेळाने तो खोलीत आला. तिचे रडून लाल झालेले डोळे आणि नाक पाहून त्याला वाईट वाटल असाव. तिच्या जवळ जाऊन त्याने तिच्या डोक्यावर थोपटलं आणि तो बाहेर जाऊ लागला.

" सॉरी." तिच्या आवाजाने तो थांबला.

" मी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही आहे. ह्या घराला, तुम्हाला बाळ देण्यात मला यश मिळत नाही आहे. आपण divorce घेऊया. तुम्ही दुसरं लग्न करा. निदान तुमचं स्वप्न तरी पूर्ण होईल.


 त्याला आश्चर्य वाटलं आणि मग अपराधीही. आपण आपल्या स्वप्नाच्या नादात तिची मन:स्थिती समजूनच घेतली नाही. त्यांचं arrange  marriage असलं तरी गेल्या दिड वर्षात त्यांना एकमेकांची खूप सवय झाली होती. आणि त्याचं तिच्यावर प्रेम होतं. दुसऱ्या कोणाचा तो विचार ही करू शकत नव्हता. आणि ते पण फक्त बाळासाठी? आणि असंही नव्हते की त्यांचं आयुष्य किंवा  त्यांच्या कडचे सगळे मार्ग संपले होते. अगदीच नाही काही झालं तर ते दत्तक ही घेऊ शकत होते.

"वेडी आहेस का तू? मी काय फक्त बाळ होण्यासाठी तुझ्याशी लग्न केलंय? तू मला हवी आहेस ग. आयुष्याचा अखेरपर्यंत...जरी आपलं कुटुंब म्हणजे फक्त आपण दोघे असं समीकरण शेवट पर्यंत राहिलं तरी मला चालेल. पण मी तुला कधीच सोडणार नाही. माझं प्रेम आहे तुझ्यावर. परत असं बोलू नकोस. इतक्या लवकर हारून कसं चालेल? we have a long way to go dear "

तिला अगदी भरून आलं. ती लगेच त्याच्या मिठीत शिरली. दोघं बरच वेळ तशीच बसून होती....

-सुमेधा आदवडे

Friday, June 23, 2017


टूर टूर!!
तो घाई घाईत ऑफिस मधून निघालादुपारचा  वाजून गेला होतात्या दोघांचं लंच एकत्र घ्यायचं ठरलं होतं.ती एव्हाना पोहोचलीअसेलपुन्हा चिडेल आपल्यावरएक तर आधीच वैतागली आहेगेल्या आठवड्यापासून मागे लागली आहे की फिरायला जायचयंकुठेतरी  दिवस दिवस!!?? आपण चेहऱ्यावरचं आश्चर्य लपवूशकलो नव्हतोआणि मग भुणभुण गाणं चालू झालं होतंआणिचांगलं तास भर चालूच होतंगेल्या  वर्षात कुठे फिरायला नेलंयनाहीस्वतःला काही वाटतं की नाहीमुलाला पण सुट्टी आहेनाताळचीनिदान त्याच्या साठी तरी काही विचार करावासा वाटतोकी नाहीसतत आपलं आईचा विचार करातिला वाईट वाटेलतीघरात एकटी राहीलतिला कंटाळा येईलअसं आपलं आपणच गेलोतर वाईट दिसेलतिला आवडणार नाहीती रागावेलसतत आईआईआईएक मुलाचे बाप झालातकधी संसार सुरु होणारआपलामाझी काही हौस मौज आहे की नाही?.......देवा!!!

कानात कापसाचे बोळे घालून बसावसं वाटत होतंपण त्याने रानअजून पेटलं असतंनशीब त्या वेळेस आई देवळात गेली होतीनाहीतर घराचं कुरुक्षेत्र झालंच असतंच्याआयलाह्या जगात आई आणिबायको ला एका घरात एका वेळेस हॅन्डल करणारा कोणी महापुरुषसिद्ध योगीसाधू बाबा वगैरे असेल कागुरुमंत्र घेऊन येतोत्याच्याकडूनपण त्याच्याकडे गुरुमंत्र असता तर तो साधू बाबाकशाला होईलह्या विचाराने त्या परिस्थितीतही त्याच्या चेहऱ्यावरहसू आलंपण हसला असता तर आगीत तेलरॉकेलपेट्रोलडिझलसगळं पडलं असतं.

पण एका अर्थी तिचं बरोबर होतंती काय एवढा ताज महाल मागतहोती आपल्याकडे वर्षं आपण खरंच कुठेही नेलंय नाही तिलाअद्वैत आता  वर्षाचा झालात्याचघरचऑफिस सगळं करण्याततिचाही दिवस जातोतिला ब्रेक घ्यावासा वाटत असेलच नापणआईचं काय करूतिला राग येईल आम्ही तिघं अशी फिरायला बाहेरगेलो तरपरत ती पण इमोशनल ब्लॅकमेल करणारच आपल्यालातुझे बाबा असते तर मला हे दिवस दिसले नसते अँड ऑलकायकरू यार मीआज निक्षून सांगितलंय बायकोने लंच एकत्र करायचाआणि त्या नंतर टूर्स च्या ऑफिस मध्ये जाऊन  दिवसांची तूर बुककरायची म्हणजे करायचीचहा बॉम्ब घरी फुटला तर आई माझ्यावरतोफ डागायला तयार असेलचआज वाट लागणार हे नक्की!

वाटेत त्याची बाईक सिग्नल ला थांबली तेव्हा शेजारच्या बाईक वरएक couple होतं.त्यांचा वाद चालू होता.
हे काय रेआपण आपलं आयुष्य कधी जगणारजरा कुठे  दिवसफिरून येऊ म्हटलं तर तुझ्या आई वडिलांना आताच यायचं होतंआपल्या घरी?"
"अगंअशी काय करतेसते जवळ जवळ - महिन्या नंतर यायचंम्हणत आहेतत्यांना नाही कसा म्हणायचं?  आपण जाऊ कि पुढल्यामहिन्यात!"
हे तू गेल्या  महिन्या पासून म्हणत आहेसतुझा पुढचा महिनापुढच्या जन्मावर जाईल आताआणि नकोच मला पुढचा जन्म ह्याघरातह्याच जन्मी धन्य जाहले मी!" म्हणत तिने हात जोडूनकपाळाला लावले.
"मला माहित नाही त्यांना पुढल्या महिन्यात यायला सांगआपण ह्यामहिन्यातच फिरायला जायचंबस झालं आताखूप सहन केलं मीमला काही life आहे कि नाही?"

तो बिचारा गप्पइतक्यात सिग्नल चालू झालामनात हा म्हणाला," घरोघरी..." त्याच्या समोर ही आज असच काही मोठ्ठ ताटनव्हे थाळीपरात काय असेल ते वाढून ठेवलं होतंजे त्याला निस्तरायचं होतं.

विचार करत करत तो ठरलेल्या त्यांच्या नेहमीच्या हॉटेल  मध्येपोहोचलातिने table बुक करून ठेवला होताह्या गोष्टी तिला कधीसांगाव्या लागल्यात नाही त्यालाती अगदी परफेक्ट होतीसगळ्यात.... वेल.. काही गोष्टीत.
तिच्या समोर बसून त्याने नेहमी प्रमाणे हसून आधी सॉरी म्हटलंमगदोघांनी ठरवून ऑर्डर दिली आणि गप्पा मारू लागलीतीच बोलतहोतीत्याला ऑफिस चे किस्से सांगत होतीबोलता बोलताफिरण्याचा विषय निघाला आणि त्याला ठसका गेलात्याला पाणीदेत ती म्हणाली,
अहो हळू जरापाणी घ्या!"  तो शांत झाल्यावर ती पुन्हा बोलूलागली.
हामी काय बोलत होतेऑफिस मध्ये हल्ली काम वाढलंय होह्यामंथ एन्ड ला आमचे ग्लोबल हेड येणार आहेत ऑफिस लाते आठवडे तरी थांबतीलआणि त्या नंतर तर कामाचा लोड आणखीवाढेलमला नाही वाटत आपल्याला इतक्यात काही टूर वगैरे प्लॅनकरता येईल असं."
त्याचा स्वतः;च्या कानांवर विश्वास बसेना ! हे म्हणजे कोणाकडे हजाररुपये मागावे आणि त्याने एक blank  cheque सही करूनआपल्याला हातात ठेवावा असं झालंमनातून आनंदाच्या उकळ्याफुटत होत्यापण आता लढाईका शेवटचा टप्पा जिंकायचा तर शत्रूला सहानुभूती दाखवणं ह्या परिस्थितीत गरजेचं होतंतरच सगळंनॉर्मल होणार होतंत्याने तिचा हात हातात घेऊन म्हटलं,

इट्स ओकेआय कॅन अंडरस्टॅंडआपण पुन्हा कधी तरी जाऊतूतुझ्या कामावर focus कर."

जेवण झालंत्याने बिल दिलं आणि दोघे बाईक ने निघाली.तिलातिच्या ऑफिस जवळ सोडून तो निघून गेलाती वर ऑफिस मध्येआलीतिच्या डेस्क वर आल्या नंतर थोड्या वेळाने तिची मैत्रीणआली तिच्या कडे.

"काय कुठली टूर बुक केलीत?"

"नाही आम्ही नाही जाणार आहोत." ती.

का?" तिने आश्चर्याने विचारलंतिला माहित होतं हिला ब्रेक चीकिती गरज आहे ते.

"अगंत्याला खूप जड गेलं असतं आईंना आम्ही फिरायला जातोय हेसांगणंशिवाय त्या इथे एकट्या राहिल्या असत्या तर हा पण आमच्यासोबत काही एन्जॉय करू शकला नसता त्याचं अर्ध लक्ष आईंकडेचलागून राहिला असतंशिवाय त्याला guilty पण वाटत राहिलं असतंतो खूप हळवा आहे  त्यांच्या बाबतीत.शिवाय मला नाही म्हटलंअसतं तर मी पण धारेवर धरलं असतं त्यालामग मी कामाची टेपलावली आणि मलाच नाही जमणार म्हणून सांगितलं"

अगं ह्याला काय अर्थ आहेआणि  त्यात guilty  काय वाटायचतुम्ही तुमचं life कधी जगणार ?

तिने हसून उत्तर दिलं,
"आम्हीरोजच्या येणाऱ्या प्रत्येक क्षण सोबत आमचं life जगणार ! जाऊ दे आपलं माणूस आहेत्याला तरी कोण समजून घेणार?

-सुमेधा आदवडे